घराच्या भिंती आणि छपराच्या आधारे जाळे विणून भक्ष्य त्यात अडकण्याची वाट पाहात असलेला कोळी हा किटक आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. घर कितीही जुने किंवा नव्या पद्धतीने बांधलेले असले तरी कोळय़ाच्या प्रवेशापासून ते मुक्त रहात नाही. कोळी या किटकाबद्दल आपल्याला एकप्रकारचा तिटकारा असतो. त्यामुळे तो येताच त्याला झटकून टाकण्यासाठी आपण प्रयत्नशील असतो.
तथापि, कोळी हा किटक मानवाच्या फायद्याचा असल्याचा शोध कुमाव येथील किटक विज्ञान संशोधक डॉ. हिमांशू पांडे यांनी लावला आहे. त्यांनी विविध प्रकारच्या कोळय़ांचा सखोल अभ्यास करून त्यांच्याविषयीचे एक शोधपत्र प्रसिद्ध केले आहे. यासाठी त्यांना यंग सायंटिस्ट पुरस्कारही प्राप्त झाला आहे. त्यांनी सेल्टीसाईडी नामक परिवारातील कोळय़ांच्या प्रजातींचा विशेष अभ्यास केला आहे. कोळी हा किटक उत्तम गुणवत्तेचा जैवनियंत्रक असल्याचे त्यांच्या संशोधनातून आढळून आले आहे. शेतकऱयांसाठी तो विशेष लाभदायक आहे. कृषी इको सिस्टीम निर्माण करण्यामध्ये कोळय़ाचे महत्त्वपूर्ण योगदान सिद्ध झाले आहे. जगात कोळय़ांच्या साधारणतः पाच लाख प्रजाती आहेत. यापैकी 49 हजार प्रजाती 2021 च्या जैवसूचीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. भारतात सेल्टीसाईडी परिसरातील 192 प्रजाती सापडतात. तसेच होमीसाईडी परिवारातील 100 हून अधिक प्रजाती आहेत. कोळी झाडांची रोपटी, मोठी वाढलेली फळझाडे आणि पिकांचे घातक किडीपासून संरक्षण करतात. ही कीड त्यांचा आहार असते. पिकांसाठी कोळी जणू किटकनाशकांचे कार्य करतात. कृत्रिम किंवा रासायनिक किडनाशकांमुळे पर्यावरणाचे नुकसान होते. पावसाबरोबर ही किडनाशके तलाव आणि जलसाठय़ांमध्ये उतरतात. ज्यामुळे तेथील जीवसृष्टी नाहीशी होते. तथापि, कोळय़ांमुळे असे पर्यावरणाची कोणतीही हानी होत नाही. कोळी हा नैसर्गिक किटनाशक आहे. त्यामुळे शेतांमध्ये जाणीवपूर्वक कोळय़ांची पैदास केल्यास किटनाशकाचा खर्च वाचतो. तसेच पिकाचे अधिक चांगल्या प्रकारे संरक्षण होते. अशा बहुउपयोगी कोळय़ांच्या अनेक प्रजाती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. शेतीमध्ये विषारी किटनाशकांचा उपयोग वाढल्याने कोळय़ांवरही संक्रांत आली आहे. कोळय़ांचे संरक्षण होणे आवश्यक आहे, असे पांडे म्हणतात