कीड नियंत्रणासाठी प्रयत्न आवश्यक
बेळगाव : खरीप हंगामात पेरणी केलेल्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. वेळीच किडीवर नियंत्रण आणण्यासाठी काही ठिकाणी कीटकनाशकांची फवारणी सुरू झाली आहे. आधीच पाऊस उशिराने दाखल झाला असतानाच आता पिकांची पाने पिवळी आणि लालसर दिसत आहेत. यंदा तब्बल 7.10 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यापैकी 6 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे. विशेषत: ऊस, भात, सोयाबीन, बटाटा, भुईमूग, तूर, मका, सूर्यफूल, उडीद, कापूस आदी पिकांची लागवड आणि पेरणी झाली आहे. मात्र, यापैकी काही पिकांवर आता किडीचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. जुलै अखेरदरम्यान झालेल्या दमदार पावसानंतर समाधानकारक पेरणी आणि लागवड झाली होती. मात्र, आता किडीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहेत.
शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज
विशेषत: मका, सोयाबिन, रताळी, बटाटा पिकांवर किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पाने खराब होऊन पिवळसर होऊ लागली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. पेरणीसाठी मोठा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे आता कीटकनाशकांसाठी पुन्हा खर्च वाढला आहे. शिवाय किडीच्या नियंत्रणासाठी कोणते किटकनाशक वापरावेत, याबाबतही शेतकरी अनभिज्ञ आहेत. वाढती किड वेळेत नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, आणि योग्य कीटकनाशक उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.
योग्य कीटकनाशक घेऊनच फवारणी करा
यंदा पाऊस उशिराने झाला असला तरी पेरणी सुरळीत झाली आहे. काही ठिकाणी किडीचा प्रादुर्भाव वाढल्याच्या तक्रारी येत आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी योग्य कीटकनाशक घेऊनच फवारणी करावी. याबाबत जवळच्या रयत संपर्क केंद्रात संपर्क साधावा. रयत संपर्क केंद्रात कीटकनाशक सवलतीच्या दरात उपलब्ध करण्यात आली आहेत.
-एम. एस. पटगुंदी, तालुका कृषी अधिकारी