अध्याय सत्ताविसावा
उद्धवाच्या प्रेमाने ओथंबलेले भगवंत उद्धवाला आता प्रत्यक्ष पुजाविधीबद्दल सविस्तर माहिती देत आहेत. ते म्हणाले, भक्ताने आपण आणि भगवंत एकच आहोत हा भाव मनात दृढ करावा म्हणजे उत्तम अशी अभेदभक्ती निर्माण होते. मग बाह्य पूजेकरिता प्रतिमेस आवाहन करावे. आपण प्रतिमेच्या समोर बसून आवाहनमुद्रा दाखवून माझी सारी चैतन्यशक्ती त्या प्रतिमेत आली आहे अशी भावना करावी. अशी भावना केली की, समोरील मूर्ती निर्जीव आहे असे यत्किंचितही मनात आणू नये. समोरील मूर्ती माझ्या चैतन्याने भारलेली आहे असेच मानावे. ह्यालाच मुख्य ‘आवाहन’ असं म्हणतात. आता ती मूर्ती निर्जीव न होता माझ्या चैतन्याने युक्त झालेली असते. ह्यालाच प्राणप्रतिष्ठा करणे असेही म्हणतात. तो विधी पूर्ण होण्यासाठी गुरूच्या मुखातून मिळालेल्या निर्दोष मंत्राने मूर्तीच्या सर्वांगावर, शास्त्राsक्त मंत्र म्हणून सर्व न्यास सावकाश करावेत. न्यास केले की मूर्ती शुद्ध होते. अशा प्रकारे आवाहन, संस्थापन, संनिधी, सन्निरोधन, संमुखीकरण, स्वायतन ह्या मुद्रा दाखवाव्यात तसेच त्यापुढे अवगुंठन संकलीकरण मिळून आठ मुद्रा दाखवून मग पूजाविधी आरंभ करावा. त्यापूर्वी माझ्यासाठी दर्भ इत्यादी नऊ गुणांनी युक्त आसन तयार करावे. त्या आसनावर एक अष्टदळ कमळ तयार करून त्याचा मध्यभाग पिवळा करावा. त्यावर मूर्ती ठेवून पाद्य, आचमनीय, अर्घ्य इत्यादी उपचार अर्पण करावेत. याप्रमाणे भोग आणि मोक्ष प्राप्त होण्यासाठी वैदिक आणि तांत्रिक मंत्रांनी माझी पूजा करावी. अशी पूजा करत असताना त्यातील काही गोष्टी कल्पनेने मनात उभ्या करायच्या असतात. उदाहरणार्थ, स्नानमंडपाची कल्पना करून तेथे चित्स्वरूप देवाला आणावे आणि पाद्य, अर्घ्य, आचमन, मधुपर्क इत्यादि विधान करावे. अभ्यंगाने अंगमर्दन करावे. त्यासाठी तेल, तूप, अत्तर इत्यादि स्निग्ध पदार्थांचा मूर्तीवर लेप करावा. नंतर पुरुषसूक्ताने यथोक्तस्नान घालावे आणि स्नानाच्या मंडपातच देवाला पीतांबर नेसवावा. नंतरचे यथोक्त पूजन सिंहासनावर करावे. त्यासाठी आवश्यक ते आसन व पीठावरण (म्हणजे पीठाला वेष्टून राहणाऱ्या देवता) यांची कल्पना कशी करायची ते सांगतो. सिंहासनावरील आवरणक्रम सांगायचा झाला तर आधारशक्ती, मूलप्रकृती, क्षीराब्धी, श्वेतद्वीप व तेथील मनोरम कल्पवृक्ष इत्यादिक तेथे आहेत अशी भावना करावी. त्याच्याखाली सुरेख रत्नखचित मंडप, त्यात सुवर्णाचा मंचक आहे अशी कल्पना करावी. त्या पलंगाबद्दल श्रीकृष्ण असं सांगतात की, धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य ह्या चार पायांवर तो मंचक तोलून धरला आहे असे समजावे. तसेच अधर्म, अज्ञान, अनैश्वर्य व अवैराग्य ही त्या मंचकाच्या चौकटीची चार आडवी लाकडे होत. ईश्वरी तत्त्व हे मूळ सूत होय. ते गुणागुणांनी वळून हा मंचक योगयुक्त महामुद्रेने मजबूत विणला आहे असे कल्पावे. असा मंचक तयार झाल्यावर, त्या मंचकावर अत्यंत सुंदर व शोभिवंत असे शेषाचे वेटोळे असून पाठीमागे छत्रासारख्या लागलेल्या त्याच्या हजार फणा त्यातील रत्नांच्या दिव्यतेजाने झळकत आहेत अशी कल्पना करावी. पुढे शेषाच्या वेटोळ्यामध्ये देठासह निर्मळ लाल कमळ उमलले आहे, त्याला आठ पाकळ्या असून ते मनोहरपणाने शोभत आहे असे दृश्य डोळ्यासमोर आणावे. हे कमळ कसे तर, सत्-शक्ती हे त्या कमलकंदाचे मूळ व ज्ञान हा त्याचा सरळ देठ आणि अष्टधा प्रकृती ह्या त्या कमळाच्या आठ पाकळ्या होत. असे ते अत्यंत सुंदर कमळ असून षड्विकार हे त्याचे केसर होय आणि वैराग्य हा त्यातील घमघमीत मकरंद होय. पूर्वादि अष्ट दिशांच्या, अष्टधा प्रकृतीच्या कमळदळांमध्ये त्या त्या देवतांचा न्यास करावा. विमळा, उत्कर्षिणी, ज्ञाना आणि चौथी क्रियाशक्ती त्याचप्रमाणे योगा, प्रव्ही, सत्या आणि ईशाना अशा अष्टशक्तींची त्यात स्थापना करावी.
क्रमश: