सीमावादादरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे निर्देश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आसामच्या विवादित सीमेवरील गावांमध्ये राहणारे नोंदणीकृत मतदार आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावू शकणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शुक्रवारी दिली. ते सध्या मेघालयातील निवडणूक तयारीचा दोन दिवसीय आढावा घेण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या पथकाचे नेतृत्व करत आहेत.
आसाम-मेघालय सीमेवरील गावांची प्रत्यक्ष पाहणी आणि अभ्यासाअंती राजीव कुमार यांनी शुक्रवारी मताधिकारीसंबंधी महत्त्वाचे निर्देश दिले. वादग्रस्त सीमेवरील गावांमध्ये राहणारे लोक येत्या विधानसभा निवडणुकीत भाग घेऊ शकतात, असे ते म्हणाले. दोन्ही बाजूंच्या संयुक्त बैठका झाल्या असून वरि÷ पातळीवरही चर्चा सुरू आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि काळजी करण्यासारखे काहीही नसल्याचे ते म्हणाले.
निवडणूक आयोगाने संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच दोन्ही राज्यांमधील संबंधित जिल्हाधिकाऱयांशी सविस्तर बैठका घेतल्या आहेत. आयोगाने 16 केंद्रीय एजन्सींना संवेदनशील मतदारसंघात समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले आहेत, असे ते म्हणाले. निवडणूक काळात राज्यात येणारी विमाने आणि हेलिकॉप्टर यांची योग्य तपासणी करण्यासाठी मानक कार्यपद्धतीचे पालन करण्यास सांगितले आहे. कोणताही राजकीय पक्ष किंवा उमेदवार मतदारांना रोख रकमेचे आमिष दाखविण्याचा प्रयत्न करत असल्यास योग्य देखरेख ठेवण्याची सूचनाही करण्यात आली आहे. मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी आयोगाच्यावतीने योग्य पावले उचलली जातील, असे कुमार म्हणाले.
सीमावादामुळे संघर्ष
आसाम आणि मेघालयमधील विवादित सीमेवर गेल्यावषी नोव्हेंबरमध्ये हिंसक चकमकी झाल्या होत्या. या संघर्षात मेघालयातील पाच आदिवासी ग्रामस्थ आणि आसाममधील वनरक्षकासह किमान सहा लोक ठार झाले होते. आसाम आणि मेघालयमध्ये 884.9 किमी आंतरराज्य सीमेवरील 12 भागांवर दीर्घकाळ विवाद आहे. दोन्ही राज्यांनी गेल्यावषी मार्चमध्ये सहा क्षेत्रांमधील वाद संपवण्यासाठी सामंजस्य करार केला होता.