केसीआर यांच्याकडून काँग्रेस लक्ष्य : विरोधी पक्षांच्या ऐक्याला तडा
वृत्तसंस्था/ हैदराबाद
कर्नाटकातील निवडणुकीत विजय मिळविलेला काँग्रेस पक्ष आता राज्यात शपथग्रहण सोहळ्याच्या तयारीत आहे. याकरता देशभरातील अनेक नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे, परंतु तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आमंत्रित करण्यात आले नसल्याचे समजते. यावरून केसीआर अन् काँग्रन्मधील राजकीय संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयावरून केसीआर यांनी उपरोधिक टिप्पणी केली आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाने राष्ट्रीय राजकीय स्थितीत काहीच बदल होणार नसल्याचा दावा केसीआर यांनी केला आहे.
कर्नाटकातील निवडणुकीत भाजप पराभूत होत काँग्रेसने सत्ता मिळविली आहे. कुणी जिंकला तर कुणी पराभूत झाला आहे, परंतु यामुळे काय बदलणार? कुठला बदल होणार का? माझ्यामते काहीच बदलणार नाही. मागील 75 वर्षांपासून याच कहाणीची पुनरावृत्ती होत राहिली असून यात कुठलाच बदल नसल्याचे केसीआर यांनी म्हटले आहे. केसीआर यांनी एकप्रकारे काँग्रेसला कर्नाटकातील विजयामुळे देशातील राजकीय स्थिती बदलणार नसल्याचे सुनावले आहे.
लोकसभा निवडणुकीला एक वर्ष शिल्लक असताना आणि विरोधी पक्ष एकजूट होण्याचा प्रयत्न करत असताना केसीआर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. केसीआर यांनी अलिकडेच काँग्रेसला वगळून अन्य विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले होते. विरोधी पक्षांचे ऐक्य आणि तिसरी आघाडी निर्माण करण्यावरून अनेक प्रकारचे दावे केले जातात, परंतु याचे नेतृत्व कोण करणार याचे उत्तर कुणाकडूनच देण्यात आलेले नाही.
तेलंगणात केसीआर-काँग्रेसमध्ये थेट लढत
तेलंगणात चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. या राज्यात केसीआर यांच्या पक्षासमोर काँग्रेसचे आव्हान आहे. 2018 च्या निवडणुकीत काँग्रेस राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. केसीआर यांयच पक्षाला 47.4 टक्के मतांसह 88 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेस 28.7 टक्के मतांसोबत 19 जागांवर विजयी झाला होता. केसीआर यांनी अलिकडेच स्वत:च्या पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती करत अन्य राज्यांमध्येही राजकीय पाऊल टाकण्याची योजना आखली आहे.