वास्कोवासियांची जोरदार मागणी : रविवारी नवे 33 रुग्ण आढळले : नवेवाडे, ओरुले, शांतीनगरमध्येही लागण
प्रतिनिधी / पणजी
राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत चालला असून लोकांमधील भीतीही वाढत चालली आहे. वाढत्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रविवारी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याशी कोरोना फैलावाबाबत चर्चा केली. वास्कोतील मांगोर हिल येथे कोरोनाने थैमान घातले असतानाच आता शांतीनगर वास्को येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे आता वास्कोत लॉकडाऊन कडक करण्याची मागणी वाढत चालली आहे. रविवारी नव्याने 33 रुग्णांची भर पडली असल्याने राज्यात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 235 वर पोहोचली आहे.
मांगोर हिल येथे रविवारी नव्याने आणखी रुग्ण सापडले आहेत. मांगोर हिल येथील स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. मांगोर हिलबाहेरही कोरोनाने प्रवेश केला आहे. मांगोर हिल परिसर सील केला असतानाही आता शांतीनगर येथे रुग्ण सापडल्याने वास्कोत खळबळ माजली आहे. लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नगरसेवकाने आता शनिवारी एकाच दिवशी मांगोर हिल येथे 62 रुग्ण सापडले होते. रविवारी पुन्हा रुग्ण सापडल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. कुंकळय़े-फेंडा येथेही एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे, तर दोन दिवसाअगोदर मोर्ले सत्तरी येथेही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता.
कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली 235 वर
शनिवारी एकाच दिवशी राज्यभरात 71 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या 202 एवढी आली होती. रविवारी आणखी 33 नवीन रुग्ण सापडल्याने संख्या आता 235 वर पोहोचली आहे. रविवारी सापडलेल्या 33 रुग्णांपैकी अर्धे रुग्ण मांगोर हिल वास्को येथील आहेत. त्याचबरोबर शांतीनगर वास्को येथेही एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे.
कसा रोखणार कोरोनाचा फैलाव
मांगोर हिल सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. मांगोर हिल येथे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. आता शांतीनगर भागातही कोरोनाचा प्रवेश झाला आहे. वेगाने वाढत चाललेला फैलाव कसा रोखला जाणार हा प्रश्न सध्या वास्कोवासियांना भेडसावत आहे. फैलाव रोखण्यासाठी लोक वास्कोत लॉकडाऊन कडक करण्याची मागणी करत आहेत, पण सरकार लॉकडाऊन करायला तयार नाही. सरकार पक्षाचे आमदार कार्लुस आल्मेदा, आमदार एलिना साल्ढाणा, मुरगावचे नगराध्यक्ष तसेच नगरसेवक व स्थानिक लोक वास्को लॉकडाऊनची मागणी करीत आहेत. मागील चार, पाच दिवसापासून ही मागणी लावून धरली आहे. शनिवारी काँग्रेसनेते संकल्प आमोणकर यांनीही मागणी केली आहे, तर रविवारी शांतीनगरच्या स्थानिक नगरसेवकाने वास्को लॉकडाऊनची मागणी केली.
सरकारच्या मनात नक्की काय चाललेय
लॉकडाऊनसाठी सरकार का तयार नाही हा मोठा प्रश्न सध्या वास्कोवासियांसमोर आहे. वास्को हॉटस्पॉट बनला असतानाही सरकार लॉकडाऊनच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे सरकारच्या भूमिकेबाबत वास्कोत संशयाचे वातावरण आहे. सध्या वास्कोत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. पाऊस सुरू होऊन सलग कोसळायला लागला तर काय स्थिती निर्माण होईल सांगता येत नाही. सरकारला याची जाणीव नाही का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
…………………..बॉक्स……………………………………..
आतापर्यतची एकूण रुग्णसंख्या 300 वर
राज्यात रविवारी 33 नवे कोविड रुग्ण सापडले आहेत. यातील 30 जण वास्को मांगोरहिल येथील आहेत. आता गोव्यात 235 कोरोना रुग्ण आहेत. यापुर्वीचे रुग्ण मिळून एकूण संख्या 300 पर्यंत पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य खात्याची सचिव नीला मोहनन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्यांच्यासोबत महसूल सचिव संजय कुमार, आरोग्य खात्याचे संचालक डॉ. जोस डिसा, राज्य रोग विषेशज्ञ डॉ. उत्कर्ष बेतोडकर, पंचायत संचालक नारायण गाड व जीटीडीसीचे संचालक निखिल देसाई उपस्थित होते.
वाढत्या रुग्णांची संख्या पाहता आता कोविड केअर सेंटर तयार करण्यात येणार आहे. शिरोडा येथील आरोग्य केंद्राचा कोविड केअर सेंटरमध्ये समावेश करुन घेण्यात आला आहे. ज्यांना कोविडची लक्षणे नाहीत, ज्यांचा अहवाल सकारात्मक आला आहे, त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहे. जेणेकरुन मुख्य कोविड लक्षणे असणाऱयांसाठी बेड्सची कमतरता भासणार नाही. स्थानिकांनी आता शिरोडा येथील कामाक्षी आयुर्वेदिक हॉस्पिटलचा ओपीडीसाठी वापर करावा, मोहनन यांनी सांगितले.
घाबरण्याचे कारण नाही ः डॉ. डिसा
कोरोनाच्या फैलावामुळे लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. गोव्यात अजून एकही मृत्यू पावलेला नाही. आतापर्यंत दाखल झालेले कोविड रुग्ण चांगल्या प्रकारे उपचाराला प्रतिसाद देत आहेत. अनेकजण बरे झालेले आहेत. आपण आपली काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या गोव्यात फक्त 5 टक्के रुग्ण हे कोविडची लक्षणे दिसणारे आहेत, बाकीच्या रुग्णांमध्ये कोविडची लक्षणे नाहीत, असे डॉ. जोस डिसा यांनी यावेळी सांगितले.
मांगोरहिल येथे परीक्षेचे सेंटर होते, त्यामुळे तेथे परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. कंटेनमेंट झोन होण्या अगोदर परीक्षा संपलेली होती तसेच या सेंटरमधील विद्यार्थी मांगोरहिलच्या बाहेर गेलेले नाही. त्यामुळे यासाठी खास पाऊले उचलेली नाही, परंतु ज्या पालकांना आपल्या मुलांची चाचणी करायची आहे त्यांनी पुढे येऊन जरुर चाचणी करुन घ्यावी, असे नीला मोहनन यांनी सांगितले.