गोडोली / प्रतिनिधी :
सातारा शहरातील राजवाड्यासमोरील चौपाटी बंद झाल्याने अनेक विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. जागेचा प्रश्न अद्यापही सुटला नसल्याने गोडोलीत पुरक जागा असून, त्या ठिकाणी चौपाटी झालीचं पाहिजे. यासाठी नगरपालिकेने त्याबाबत लवकर योग्य ती कार्यवाही करावी, असे निवेदन नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांना गोळीबार मैदान युवा मंचाच्या वतीने सुरज देवडे आणि युवा कार्यकर्त्यांनी दिले.
साताऱ्यातील छोट्यांपासून जेष्ठांपर्यंत सर्वांना आवडते ठिकाण असलेली राजवाडा चौपाटी कायद्याच्या कचाट्यात अडकल्याने बंद झाली आहे. गेली वर्षभर या चौपाटीचे पुर्नवसन करण्यात नगरपालिकेला यश आले नाही. त्यामुळे तेथील विक्रेत्यांच्यावर उपासमार सुरू झाली आहे. तर अनेकांनी अवाच्या सव्वा भाडे देऊन गल्ली बोळात हातगाडीवर किरकोळ विक्री करत आहेत.
गोडोलीत त्रिशंकू भाग, विलासपूर भाग आता सातारा नगरपालिकेत हद्दवाढीमुळे समावेश झाला आहे. दुय्यम निबंधक कार्यालयाच्या समोर भव्य रिकामी जागा जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षेत येते.त्या जागेवर चौपाटी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. गोळीबार मैदान युवा मंचाच्या युवा कार्यकर्त्यांनी गोडोलीतचं चौपाटी व्हावी, यासाठी सुरज देवडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी अभिजित बापट निवेदन दिले.