कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांचा गौप्यस्फोट,
प्रतिनिधी/ सातारा
अडीच वर्षापूर्वी 2019 च्या निवडणुकीत जनतेपुढे मतं मागताना शिवसेना- भाजपा म्हणून मागितली होती. मतदारांनी बहुमतापेक्षा जास्त मतदान करुन महायुतीला निवडून दिले होते. सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री करणार असे सांगण्यात आल्याने आम्ही सगळे आमदार अगोदर आनंदी झालो होतो. परंतु काही दिवसातच ज्यांच्या विरोधात लढलो त्या काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करावे लागले. ठाकरे परिवाराचे डावपेच माहिती नव्हते, असा गौप्यस्फोट कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात साताऱयात केला. दरम्यान, मेळाव्यात मंत्री देसाई यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची झुंबड उडाली होती.
शिवसेनेच्या मेळाव्याला आमदार महेश शिंदे, जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे, जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव, जयवंत शेलार, बाबूराव माने, चंद्रकांत जाधव, एकनाथ ओंबळे, प्रदीप माने, शहर प्रमुख निलेश मोरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी शंभूराज देसाई म्हणाले, मुख्यमंत्री आपल्या जिल्हय़ातील आहेत. शिवसेनेची ताकद वाढवण्याचे काम करुयात. साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांला कॅबिनेटमंत्री केले. मी आमदार असताना अनेक शिवसैनिकांना मदत केली. राज्यमंत्री असतानाही अनेकांची कामे केली. माझ्याकडे येत होते ती मंडळी आता दिसत नाहीत. अधिवेशनातून मोकळा होऊद्यात ती पण मंडळी येतील. आपल्याकडील कार्यकर्त्याना ओळखपत्र द्या, ओळखपत्रामुळे हौसे-गवसे ओळखले जातील. आपल्या कार्यकर्त्यांना वाव मिळेल. अडचणीत असताना शिंदे साहेबांच्यासोबत जे होते त्या कार्यकर्त्यांना प्राधान्य देऊ, मी मंत्री असताना साहेबांसोबत गाडीत बसलो. पहिल्या दिवशी आम्ही 14 जण होतो आता सेनेचे 40 आणि अपक्ष 11 जण आहोत. आपल्याला कोण गद्दार म्हणत असेल, कोण पाठीत खंजीर खुपसला म्हणत असेल, कोण बंडखोर म्हणत असेल. आम्ही ही भूमिका का घेतली हे तुमच्या लक्षात आले पाहिजे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना- भाजप युती केली. हिंदूत्वाच्या अजेंडय़ावर ही युती होती. 2019 चा निवडणुकीत भाजपा आणि सेनेच्या युतीवर लढवल्या गेल्या. लोकांनी युतीला मते दिली. आपले बहुमतापेक्षा आमदार निवडून आले होते. त्यावेळी उद्धवसाहेब हे सामान्य शिवसैनिकांना मुख्यमंत्री करणार असे म्हणाले होते. आम्ही सगळे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होणार म्हणून आनंदी झालो होतो. परंतु शिंदे साहेब म्हणाले, थांबा थोडे. तर लगेच त्याचे उत्तर मिळाले. ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्यासोबतच सरकार स्थापन करायचे हे कळले. ठाकरे परिवाराचे आतले डावपेच माहिती नव्हते. आमचे मंत्री असताना अडीच वर्षात हाल-हाल झाले. पाच पाच खाती होती, मनासारखे निर्णय घेता येत नव्हते. मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना नगरपालिका निवडणूक झाल्या, आपला पक्ष चौथ्या नंबरवर होता. सामान्य शिवसैनिकांना शिवभोजन केंद्र आम्हाला देता आले नाही. ज्या तालुक्याचा आमदार आहे तिथल्या तरी कार्यकर्त्याला शासकीय कमिटय़ावर घ्या असे आम्ही पक्ष प्रमुखांकडे मागणी करत होतो. परंतु गेल्या अडीच वर्षात कोणत्याही कमिटीवर घेतले जात नव्हते. सामान्य शिवसैनिकांना गेल्या अडीच वर्षात मातोश्रीबाहेर दिवस दिवस थांबावे लागत होते. आता सतत खुली असते मातोश्री. आम्ही अडीच वर्षे हेच म्हणत होतो. मुख्यमंत्र्यांचा जनता दरबार घ्या, आपल्या मंत्र्यांना सोबत घ्या, अडीच वर्षात फार थोडा वेळ मुख्यमंत्री बाहेर आले. जसा कोव्हिड मुख्यमंत्री यांना होता तसा उपमुख्यमंत्री यांना नव्हता का?, मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या केबीनबाहेर जत्रेसारखी गर्दी असायची. कार्यकर्ता आला की काम पूर्ण करुनच जायचा. तसे मुख्यमंत्र्यांच्या येथे होत नव्हते. सहनशिलतेच्या बाहेर गेल्याने आम्हाला निर्णय घ्यावा लागला. सध्या पोफळीतल्या स्थानिकांचे आंदोलन सुरु आहे. ज्यांची जागा धरणात गेली त्यांना महावितरणमध्ये घ्या म्हणून आंदोलन सुरु आहे. अडीच वर्षात चार वेळा मुख्यमंत्र्यांना सांगितले परंतु त्यांनी ऐकले नाही, अशीही खंत व्यक्त केली.
शिंदे साहेबांच्या एका फोनवर पुलाच्या कामाला मंजुरी
महाबळेश्वर तालुका दुर्गम आहे. याच तालुक्यातील दुर्गम भाग जोडणारा पुल मंजूर होत नव्हता. त्यावेळी मंत्री एकनाथ शिंदे यांनी एक फोन फिरवला अन् पुलाला 435 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. आणि त्या पुलाचे श्रेय घेतय कोण?, मी स्वतः या घटनेचा साक्षीदार आहे. साहेबांनीच पूल मंजूर केला आहे. 20 वर्षापासून या पुलाकडे पाहिले नव्हते, असे ही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
बेशिस्त आणि गर्दी
जिह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावल्याने छोटेखानी हॉलमध्ये प्रचंड गर्दी होती. प्रत्येक कार्यकर्त्यास मंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत फोटो काढायचा असल्याने झुंबड लागली होती. रेटारेटी अन् फोटोसाठी प्रत्येकाची धडपड सुरु असल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे बेशिस्तीचे दर्शन पहायला मिळाले.