166 कोटी खर्चाचा प्रकल्प, मलनिस्सारणाचा प्रश्न अखेर मार्गी : नीलेश काब्राल, भू-गटार वाहिन्या टाकणार
प्रतिनिधी /कुडचडे
कुडचडेत मलनिस्सारणाशी संबंधित जो विषय होता तो सुटलेला आहे. मुख्यत्वे तो जागेच्या प्रश्नामुळे अडखळला होता. त्या जागेचा विषय सोडवायला अंदाजे दीड वर्ष लागले व आता सोपस्कार पूर्ण करून सदर जमीन सरकारने प्रकल्पासाठी संपादित केलेली आहे. लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे, असे उद्गार स्थानिक आमदार असलेले वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी काढले.
सदर प्रकल्पाचे काम सुरू झाल्यावर जनतेला जरा कळ सोसावी लागणार आहे. कारण ज्याप्रमाणे भूमिगत वीजवाहिनी घालण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे या प्रकल्पासाठीही भूमिगत वाहिनी घालण्यात येणार आहे. पण यावेळी आवश्यक ठिकाणीच खड्डे खोदले जाणार आहेत. तरी सदर खड्डे खोदल्यामुळे नाराज होण्याची गरज नाही. कारण एखादे शहर जेव्हा विकासाच्या वाटेवर जाते तेव्हा अशा प्रकारच्या अडचणी जनतेला सोसाव्या लागतात. तेव्हाच पुढे काही तरी चांगले बघायला मिळते, असे काब्राल पुढे म्हणाले.
कुडचडे मतदारसंघात होऊ घातलेल्या अंदाजे 166 कोटी रुपयांच्या मलनिस्सारण प्रकल्पाच्या पायाभरणीनिमित्त कुडचडे रवींद्र भवनमध्ये आयोजित केलेल्या सोहळय़ात ते बोलत होते. मलनिस्सारण महामंडळ अध्यक्ष आंतोनियो फर्नांडिस, कुडचडेचे नगराध्यक्ष विश्वास सावंत, उपनगराध्यक्षा रूचा वस्त, नगरसेवक प्रमोद नाईक, कार्मेलिना मोराईस, योलांदा पेरेरा, टोनी कुतिन्हो, रिमा एलिस, असोल्डाचे उपसरपंच सुशांत नाईक, पंच मनोज नाईक आणि इतर पंच, मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
भविष्याचा विचार करून आणलेला प्रकल्प
कुडचडेत येणारा हा प्रकल्प साधासुधा नसून पुढील कित्येक वर्षांचा विचार करून तो आणलेला आहे. त्यामुळे पूर्वसर्वेक्षण करूनच या प्रकल्पाला परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच या प्रकल्पासाठी वापरल्या जाणाऱया वस्तू चांगल्या दर्जाच्या असतील. यात आधुनिक पद्धतीचे पाईप घालण्यात येणार आहेत जे गंजत नाहीत व सहजा फुटणार नाहीत. सदर प्रकल्प हा पहिल्या श्रेणीचा असेल. या प्रकल्पासाठी बसविण्यात येणारी प्रणाली ही संगणकावर आधारित असेल. त्यामुळे कोणतीही अडचण आल्यास व आपत्कालीन परिस्थिती दिसल्यास संगणक लगेच त्याविषयी कल्पना देईल, असे काब्राल यांनी सांगितले.
कुडचडेत जे प्रकल्प साकारणार आहेत तेच दुसऱया ठिकाणी प्रकल्प स्वतः चालवत आहेत. त्या अनुभवांच्या आधारे कुडचडेत होणारा प्रकल्प अधिक चांगल्या पद्धतीने बनविला जाणार आहे. याव्यतिरिक्त कोणालाही माहिती हवी असल्यास अन्यथा इतर ठिकाणी सुरू असलेले प्रकल्प बघण्याची इच्छा असल्यास त्यांनी संबंधित भागातील नगरसेवक वा पंचाशी संपर्क साधावा अन्यथा आपल्या कार्यालयात येऊन भेटावे, असे आवाहन त्यांनी केले.
कुडचडेतील जनता आपल्याला निवडून देणारच
कुडचडेत सध्या आगामी विधानसभा निवडणुकीमुळे विरोधकांची रांग वाढत चालली आहे. यात लोकांनी आश्चर्यचकीत होण्याची गरज नाही. तसेच सदर रांगेमुळे आपल्याला कोणताच फरक पडणार नाही हे आपल्याला पूर्णपणे माहिती आहे. कारण कुडचडेचे लोक आजपर्यंत आपल्यासोबत राहिलेले आहेत आणि यापुढेही ते आपल्यासोबत राहणार व आपल्याला निश्चितच निवडून आणणार. त्याच आधारे पुढे कुडचडे मतदारसंघातील राहिलेले प्रकल्प आपणच पूर्ण करणार, असा विश्वास काब्राल यांनी व्यक्त केला.
कुडचडेतील जनता भाग्यवान आहे. कारण काब्राल यांच्यासारखा आमदार त्यांना मिळाला आहे. त्यांनी मंत्री झाल्यावर फक्त आपल्याच मतदारसंघाकडे न बघता राज्यातील सर्व मतदारसंघांतील विजेच्या अडचणी सोडविण्यात लक्ष घातले. तसेच अन्य कोणत्याही अडचणी येत असतील, तर त्या सोडविण्यासाठी ते स्वतः पुढाकार घेत असतात. अशा आमदारांना कुडचडेवासियांनी परत निवडून आणल्यास कुडचडेचे चित्र 100 टक्के बदलणार यात कोणतीच शंका नाही, असे आंतोनियो फर्नांडिस म्हणाले.
विकासासाठी ग्रामस्थांचे सहकार्य गरजेचे
जेव्हापासून काब्राल कुडचडेचे आमदार झाले आहेत तेव्हापासून कुडचडेत किती तरी प्रकल्प राबविले गेले आहेत. त्यातील हा प्रकल्प सर्वांत मोठा व संपूर्ण मतदारसंघासाठी आणलेला प्रकल्प आहे. त्याबद्दल एक नागरिक या नात्याने आपण त्यांचा आभारी आहे. आज विरोधक सांगत सुटले आहेत की, कुडचडेचा विकास झालेलाच नाही. आपण त्यांना सांगू इच्छितो की, विकास केला नाही म्हणून सांगणे अत्यंत सोपे आहे. विकास होण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य अत्यंत गरजेचे असते व ते सहकार्य लाभण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थाची काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळेच विकास करताना घाईगडबडीत न करता, ग्रामस्थांना अडचणीत न टाकता सदर विकास व्हायला हवा. याच कारणास्तव कोणत्याही प्रकल्पाला वेळ लागणे साहजिक आहे, असे उद्गार नगराध्यक्ष सावंत यांनी काढले.
सुरुवातीला प्रकल्प उभारणाऱयांनी चित्रफितीच्या आधारे प्रकल्पाशी संबंधित माहिती दिली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. तसेच ज्या ठिकाणी सदर प्रकल्प होणार आहे तेथे मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला.