सत्तांतराच्या अंदाजामुळे संपूर्ण देशाचे लक्ष : कडक सुरक्षा व्यवस्थेसह सर्व तयारी पूर्ण
पटना / वृत्तसंस्था
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आज (मंगळवार, 10 नोव्हेंबर) रोजी जाहीर होत आहेत. मतमोजणीसाठी कडक सुरक्षा व्यवस्थेसह सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. राज्यातील 38 जिह्यात 55 मतमोजणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. 243 जागांच्या बिहार विधानसभेत बहुमतासाठी 122 जागा मिळणे आवश्यक आहेत. जवळपास सगळय़ाच एक्झिट पोलमध्ये महाआघाडीला 120 च्या वर जागा दाखवल्यामुळे भाजप-संजदच्या चिंता वाढल्या आहेत. बिहारमध्ये विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा संजद आणि भाजप यांची युती आहे. तर तेजस्वी यादव यांचा राजद आणि काँग्रेस पक्षानेही एकत्रितपणे महाआघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली आहे. महाआघाडीला जनतेने पसंती दर्शविल्यास बिहारमध्ये सत्तांतर होण्याची शक्मयता आहे.
243 सदस्यांच्या बिहार विधानसभेसाठी तीन टप्प्यात मतदान घेण्यात आले होते. आता मतमोजणी शांततेत पार पडण्यासाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रावर निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. कोविड 19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. दरम्यान, विविध संस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांच्या (एक्झिट पोल) अंदाजानुसार राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्या महाआघाडीकडे बिहारच्या जनतेने सत्ता सोपवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. बिहार विधानसभेची निवडणूक भाजप-संजदच्या नेतृत्वातील रालोआसाठी प्रति÷sची बनली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः बिहारमध्ये तब्बल 12 प्रचारसभा घेतल्या. परंतु बिहारी मतदार यावेळी मोदींच्या कोणत्याही आश्वासने आणि घोषणांना भुलले नसल्याचेच एक्झिट पोलच्या निष्कर्षांवरून स्पष्ट होत आहे.
रालोआ आणि महाआघाडीमध्ये मोठी चुरस होणार असल्याने बहुमताचा 122 चा आकडय़ाच्या जवळपास रालोआ गेल्यास मोठा घोडेबाजार होण्याची शक्मयता वर्तविण्यात आली आहे. परिणामी राजद आणि काँग्रेस सतर्क झाले असून निवडून येणाऱया आमदारांना विजयी मिरवणुका न काढता खबरदारीचा उपाय म्हणून विजयी झालेल्या उमेदवारांना पटना येथे एका हॉटेलमध्ये ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे.
घोडेबाजाराच्या शक्यतेने महाआघाडी सतर्क
निकालाआधी आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजाने रालोआमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. त्यामुळे घोडेबाजाराची तयारी झाल्याची शक्मयता नाकारता येत नाही. परिणामी महाआघाडी सतर्क झाली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाचे महासचिव अविनाश पांडे आणि रणदीप सुरजेवाला यांना राजकीय परिस्थिती हाताळण्यासाठी बिहारमध्ये पाठवले आहे. काँग्रेसने आधीच खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेसचे दोन नेते सध्या पटना येथे मुक्कामी थांबले असून, सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.