भाजप उमेदवारावर हल्ला
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आठव्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान पार पडले आहे. राज्याच्या बीरभूम जिल्हय़ात मतदानाच्या वेळी हिंसक घटना घडल्या. इलामबाझार परिसरात भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. बोलपूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अनिर्बन गांगुली यांच्यावर दुपारी अडीचच्या आसपास हल्ला करण्यात आला. त्यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली. भाजपने या हल्ल्यासाठी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना जबाबदार धरले आहे. पोलीसात तक्रार सादर करण्यात आली आहे. अन्य काहीं स्थानांवर दोन बाँबस्फोट करण्यात आले. मात्र त्यात कोणतीही हानी झालेली नाही. आपल्या मतदारांना मतदान करू देण्यास अटकाव केला जातो अशी तक्रार तृणमूल काँगेसने केली. केंद्रीय राखीव पोलीस दले भाजपच्या उमेदवारांसाठी काम करत असल्याचा आरोपही करण्यात आला.
संध्याकाळी 5 पर्यंत 77 टक्के मतदान
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत आठव्या आणि अंतिम टप्प्यातील 35 मतदारसंघांमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 77 टक्के मतदान झाले आहे. मतदानाचा कालावधी साडेसहा वाजेपर्यंत होता. तथापि, त्यानंतरही अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसत होत्या. त्यामुळे अंतिम टक्केवारी वाढणार आहे. आज शुक्रवारी मतदानाची अंतिम टक्केवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घोषित होण्याची शक्यता आहे. या टप्प्यासमवेतच राज्यात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सर्व टप्प्यांमध्ये मिळून सरासरी 82 टक्के मतदान झाल्याचे अनुमान आहे. गुरूवारच्या टप्प्यात बीरभूम जिल्हय़ात काही स्थानांवर हिंसाचाराच्या घटना घडल्या. तसेच एका मतदान केंद्रावर मतदान यंत्रात तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने पहिला अर्धा तास मतदान खोळांबले होते. हे अपवाद वगळता इतरत्र सर्व मतदारसंघात मतदान शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडले. 2 मे या दिवशी, सकाळी आठ वाजल्यापासून चार राज्ये, एक केंद्रशासित प्रदेश आणि पोटनिवडणुकांची मतगणना होणार आहे.