शैक्षणिकपद्धतीत योग्य बदल न केल्यास / सरकार विरोधात मगोचा निषेध मोर्चा
वार्ताहर / मडकई
गोव्याच्या कित्येक तालुक्यात नेटवर्कचा अभाव असून सुध्दा ऑनलाईन शिक्षण सुरू करून सरकार व शिक्षण खाते विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहे. गोमंतकाचे भाग्य विधाते व पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी 1963 साली शिक्षणाची गंगा गोव्यात आणली. साक्षरतेचा हा विचार भाऊंनी रूजविला म्हणून गोवेकर शिकू शकला. विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सरकार व शिक्षण खाते जर भाऊंच्या विचाराना सुरूंग लावण्याचे कुटील कारस्थान रचीत असेल तर पालक व मगो पक्ष त्यांचा हा डाव लोकशाहीच्या विविध मार्गातून उधळून लावतील. येत्या 8 दिवसात सरकारने ऑनलाईन शिक्षण रद्द न केल्यास प्रत्येक तालुक्यातील उपजिल्हाधिकाऱयांच्या कार्यालयासमोर मगो पक्ष व पालक निषेध व्यक्त करून उपजिल्हाधिकाऱयांना निवेदन सादर करतील. निवेदन देऊनही निर्णय न बदल्यास येत्या विधानसभा अधिवेशनाच्या 3 दिवस अगोदर सरकार विरूध्द निषेध आंदोलन छेडले जाईल. एवढे करूनही सरकारला जाग न आल्यास अधिवेशनानंतर आझाद मैदानावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले जाईल, असे मगो ज्येष्ठ नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी तळावली येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
गोव्याचा बहुजन समाज व तळागाळातला सामान्य माणूस सुशिक्षीत व्हावा. तो शिक्षणापासून वंचित राहू नये. म्हणून मगो पक्षाचे माजी मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी दारादारात शिक्षणाची गंगा पोहचविली. मात्र सरकार शैक्षिणक क्षेत्राचा गांभीर्याने विचार न करता ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू करून शिक्षणाचा बट्टाबोळ करीत असल्याचा आरोप आमदार सुदिन ढवळीकर यांनी सरकारवर सटकून टिका करताना केला. ऑनलाईन शिक्षणावर आवाज उठविताना मगो पक्ष कुठल्याही पालकांना निषेध मोर्चात सहभागी होण्यासाठी सक्ती करणार नाही. ज्यांना या निषेध मोर्चात सहभागी व्हायचे आहे त्यांनी स्वच्छेने यावे. मगो पक्ष त्यांचे स्वागतच करील.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सरकारने त्याची तयारी करायला हवी होती. सरकारने मुलांना स्मार्ट फोन देणे गरजेचे होते. आवश्यक ठिकाणी इंटरनेटसेवेसाठी टॉवर उभारायला हवे हेते. 105 टॉवर गोव्याच्या कानापोऱयात उभारल्या नतंरच ऑनलाईन शिक्षण सुरू केले जातील असे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. मात्र हेच स्पष्टीकरण त्यांनी मागच्या अधिवेशनातही आपल्याला दिले होते. प्रत्यक्षात अजूनपर्यंत दिलेल्या आश्वासनाची पुर्तता मुख्यमंत्र्यांना करता आलेली नाही. सर्वच क्षेत्रात अपयशी ठरलेल्या भाजपा सरकारने ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू केल्यामूळे विद्यार्थ्यांना ‘एकलव्य’ बनून शिक्षण घ्यावे लागत आहे. एकलव्याला वर्गात प्रेवश न दिल्याने त्यांने तेच शिक्षण वर्गाच्या बाहेर बसून घेतले. आज तीच परिस्थिती सरकारने ऑनलाईन शिक्षण करून गोव्यातील गरीब विद्यार्थ्यांवर आणलेली आहे. नेटवर्क मिळत नसल्याने विद्यार्थी रानात जाऊन शिक्षण घेण्याचा आटापिटा करीत आहे. बाहेर धोधो पडणारा पाऊस व रानातील जनावरे यांचा विद्यार्थ्यांनी सामना करायचा की शिक्षणाकडे लक्ष द्यायचे. हा यक्ष प्रश्न विद्यार्थ्यांसमोर असतो, असे मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी या पत्रकार परिषदेवेळी सांगितले. यासंदर्भात वर्तमान पत्रातून अनेक बातम्या छापून आल्या तरीही सरकारचे डोळे उघडत नसल्याचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
निवडणुका जवळ येत असल्याचे पाहून सरकारने नुकतेच लाडली लक्ष्मी योजनेचे अर्ज भरून घेऊन ते संमत केल्याचे घोषित केले आहे. मात्र प्रत्यक्षात याच भाजपा सरकारने 2017 साली भरून घेतलेले लाडली लक्ष्मीचे अर्ज तसेच खीतपत पडून ठेवलेले आहे. सरकारकडे पैसे नसताना अर्ज संमत केल्याचे हे नाटय़ सरकार करून दाखवित आहे. हा विरोधाभास कशासाठी असा खडा सवाल आमदार श्री. ढवळीकर यांनी करून सरकारच्या दयानंद सुरक्षा योजना, गृह आधार या कशा रखडलेल्या आहेत याचा पाढाच वाचला.
‘माकड उडय़ा पक्ष’ स्थापन करा
गोव्याचे राजकारण गढूळ केलेल्या भाजपाने आता फक्त ‘माकड उडय़ा पक्ष’ या नावाने नविन पक्ष स्थापन करण्याचे राहिलेले आहे. त्यांनी तो अवश्य करावा. माकड उडय़ा मारलेल्या सर्व आमदारांना एकत्र आणून एक नवीन पक्ष स्थापन करावा आणि सर्वात जास्त उडय़ा घेतलेल्या आमदाराला या पक्षाचे त्यांनी अध्यक्ष करावे, असे मिश्कीलपणे मगो नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.