4 दिवसांपासून स्वयंचलित पर्जन्यमापनावर आकडेवारीच नाही
प्रतिनिधी/ चिपळूण
पावसाळय़ातील धोका ओळखून आणि त्यासाठी कोटय़वधी रूपये खर्च करून जिल्ह्य़ात खेड, चिपळूण आणि राजापूर येथील नद्यांवर आरटीडीएएस अर्थात रियल टाईम डेटा सिस्टीम ही अत्याधुनिक सिस्टीमसह 9 ठिकाणी एआरएस म्हणजेच ऍटोमेटीक रेनगेज स्टेशन कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र गेले 4 दिवस जिल्हय़ासाठी रेड अलर्ट जाहीर असतानाही महत्वाच्या क्षणी ही यंत्रणा पूर्णतः फेल ठरली आहे.
बंद पडलेल्या या यंत्रणेमुळे नद्यांमधील पाणीपातळी अव्वाच्या सव्वा मीटर, तर पर्जन्यमापन केंद्रावर आकडेच गायब झाले आहेत. गरजेच्यावेळी ही यंत्रणा बंद पडत असेल तर तिचा उपयोग काय, असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे खेड, चिपळूण, राजापूर या ठिकाणच्या नद्यांना आलेल्या महापुरामुळे मोठी आर्थिक तसेच जीवितहानी झाली होती. त्यामुळे यापुढे ही हानी टाळण्यासाठी यावर्षापासून नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना मिळावी व त्यातून पूर नियंत्रणासाठी प्रशासनाला मदत व्हावी, या दृष्टीने ही अत्याधुनिक यंत्रणा रत्नागिरी, सिंधुदुर्गात बसवण्याचा निर्णय झाला. त्यातूनच जलसंपदा विभागाच्या जलविज्ञान प्रकल्प नाशिकच्या माध्यमातून कृष्णा खोऱयाच्या धर्तीवर जिह्यासाठी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
जिह्यात खेड तालुक्यातील चाटव, पोयनार, नातूवाडी, दाभिळ, चिपळूण तालुक्यातील करंबवणे, नांदिवसे, दाभोळखाडी, राजापूर तालुक्यातील अर्जुना धरण, आडिवरे या 9 ठिकाणी एआरएस अर्थात ऍटोमेटीक रेनगेज स्टेशन, तर खेडमधील जगबुडी, चिपळूण येथील बहाद्दूरशेख नाका वाशिष्ठी नदी व राजापूर येथील अर्जुना नदी या 3 ठिकाणच्या नद्यांवर आरटीडीएएस ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. यासाठी जलसंपदा विभागामार्फत एक लिंकही देण्यात आली असून या लिंकवर क्लिक केल्यानंतर जिह्यातल्या 3 नद्यांच्या पाण्याची पातळी व 9 ठिकाणचे पर्जन्यमान अचूक मिळेल, असे सांगण्यात आले. जूनमध्ये सुरूवातीला ही यंत्रणा चालली मात्र जसजसा पावसाचा जोर वाढला तसा या यंत्रणेत बिघाड होत गेला. त्यात पारंपरिक केंद्र व स्वयंचलित यंत्रणांमधील पर्जन्यमान व जलपातळी यांच्यातील आकडेवाडीत मोठी तफावत आढळून येऊ लागली. स्थानिक प्रशासनाने आपल्या वरिष्ठ कार्यालयाच्या सहाय्याने ही यंत्रणा बसवणाऱया पुणेतील मेकॅट्रोनिक्स प्रा. लि. कंपनीला कळवले. मात्र त्याचा उपयोग होताना सध्या दिसत नाही.
सध्या गेल्या आठवडाभरापासून जिल्हय़ात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’चा इशारा दिला आहे. जिल्हा प्रशासनाबरोबरच स्थानिक प्रशासन अधिकारी रात्रंदिवस जागून येणाऱया आपत्तीसाठी सज्ज आहेत. असे असतानाच गेल्या 4 दिवसांपासून कोटय़वधी रूपये खर्चून बसवलेली ही अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रणा बंद पडली आहे. नद्यांवर बसवलेल्या आरटीडीएएस यंत्रणेत जलपातळीचे आकडे भलतेच दाखवले जात आहेत. राजापूर नदीची पाणीपातळी तब्बल 100 मीटर, जगबुडीची 10 मीटर वाढल्याचे तर वाशिष्ठीची पातळी 4 दिवसांपासून एकच दाखवली जात आहे. काही रेनगेज स्टेशनमध्येही 4 दिवसांपूर्वीचेच, तर काही ठिकाणी शून्य आकडे दिसत आहेत. चिपळूणमधील नांदिवसे या सहय़ाद्रीच्या खोऱयात कोणत्याच मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क मिळत नाही. येथील रेनगेज स्टेशन उभारल्यापासून बंदच आहे.
मग यंत्रणा कशासाठी बसवली?
जिल्हय़ासाठी पावसाळय़ातील जुलै महिना अधिक महत्वाचा आहे. हवामान खात्याकडून वारंवार अतिवृष्टीचा इशारा दिला जात आहे. अशा काळातच कोटय़वधी रूपये खर्च करून बसवण्यात आलेली यंत्रणा काम करत नसेल तर ती कशासाठी बसवण्यात आली, असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे. यंत्रणा बसवणाऱया मेकॅट्रोनिक्स प्रा. लि. कंपनीकडून 3 वर्षे तिची देखभाल दुरूस्ती करायची असताना 4 दिवसांपासून यंत्रणा बंद असूनही केल्या जाणाऱया दुर्लक्षतेबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.