‘वीज बिल भरणार नाही’ कृती समितीचा इशारा
प्रतिनिधी / कोल्हापूर
वीज पुरवठा खंडित करण्याची महावितरणने ग्राहकाला धमकी देवू नये. ग्राहकांविरोधात पोलीस ठाण्यापर्यंत तक्रारी देणार असाल तर कृती समितीच्या सर्व सदस्यांवर गुन्हे दाखल करा. महावितरणच्या अशा मग्रुर वागण्यामुळे येणार्या काळात जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा `वीज बिल भरणार नाही’ कृती समितीने दिला. लॉकडाऊन काळातील वीज बिल माफिसाठी कृती समितीने सोमवारी ताराबाई पार्क येथील महावितरणच्या परिमंडल कार्यालयावर धडक मारून जोरदार निदर्शने केली. यावेळी वादावादीचे प्रसंग उद्भवल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण झाले होते.
कोरोना काळातील एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीतील वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी आक्रमक झालेल्या `वीज बिल भरणार नाही कृती’ समितीने सोमवारी महावितरण कार्यालयावर धडक देत तीव्र भूमिका मांडली. कोरोना काळातील वीज बिल माफ करू, अशी घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. आता मात्र विज बिल भरावेच लागेल, अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. परिणामी अनेक ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. मात्र महावितरणने ही कारवाई थांबवावी अशी आक्रमक भूमिका कृती समितीच्या सदस्यांनी यावेळी मांडली.
दुपारी बारा वाजता ‘वीज बिल भरणार नाही’ कृती समितीचे अनेक सदस्य महावितरणच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एकत्र आले होते. या ठिकाणी निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. निवेदन स्वीकारण्यासाठी महावितरणचे मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांना बोलविण्याची मागणी करण्यात आली. मात्र मुख्य प्रवेशद्वाराच्या आत मुख्य अभियंता निर्मळे निवेदन स्विकारणार असल्याने प्रवेशद्वारातून आत जाताना कृती समितीचे सदस्य आणि पोलिसांमध्ये मोठा शाब्दिक वादावादीचा प्रसंग घडला. महिलांना प्रवेशद्वारातून आत येत असताना शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वाघमारे यांनी महिलांना धक्काबुकी केल्याने स्वप्नील पार्टे यांनी वाघमारे यांना चांगलेच फैलावर घेतले.
दरम्यान कृती समितीच्या सदस्यांनी मुख्य अभियंता निर्मळे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीत सहा महिन्यातील वीजबिल भरणार नाही, असा इशारा देत ग्राहकांना वीज कनेक्शन तोडण्याची धमकी देऊ नका, असा इशाराही कृती समितीच्या सदस्यांनी दिला. महावितरणचे कर्मचारी गावागावांमध्ये जाऊन वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करत आहेत. विरोध करणार्या ग्राहकांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. मात्र अशा पद्धतीने महावितरण गुन्हे दाखल करणार असेल, तर कृती समितीच्या सर्वच सदस्यांवर गुन्हे दाखल करा, अशी संतप्त भूमिकाही भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी मांडली. महावितरण दादागिरी करून वीज बिले वसूल करत असेल तर येणार्या काळात जनतेचा उद्रेक झाल्या शिवाय राहणार नाही. असे खडे बोल, मुख्य अभियंता निर्मळे यांना सुनावण्यात आले. वारंवार वादावादीचे प्रसंग घडल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे, बाबा पार्टे, अशोक भंडारे,सुभाष जाधव, सचिन घाटगे, भगवान काटे, जयकुमार शिंदे, स्वप्नील पार्टे, यांच्यासह या आंदोलनात महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
वीज बिल माफीचा निर्णय महावितरणच्या अधिकार कक्षेमध्ये नाही.
वीज बिल माफीचा निर्णय आमच्या अधिकारकक्षेतला नाही. दरम्यान महावितरणने टाळेबंदी कालावधीतील वीज बिले हप्त्याने भरण्याची सवलत वीज ग्राहकांना दिली आहे. या सवलतीचा लाभ घेऊन ग्राहकांनी आपली वीज बिले भरण्याचे आवाहन महावितरणने वेळावेळी केले आहे. सध्या कोल्हापूर जिह्यातील 4 लक्ष 76 हजार 741 घरगुती ग्राहकांकडे 168 कोटी रूपयांची थकबाकी आहे. महावितरण ही एक सार्वजनिक कंपनी आहे. वीज खरेदीसह दैनंदिन खर्च भागविण्यासाठी ग्राहकांकडून वीज बिलाचा भरणा करून घेतल्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा करून सहकार्य करावे. ज्या ग्राहकांना एकरकमी वीज बिल भरणे शक्य नाही, त्यांनी हप्त्याने वीज बिल भरण्याच्या सवलतीचा लाभ घ्यावा. त्यासाठी महावितरणच्या नजिकच्या शाखा किंवा उपविभाग कार्यालयात भेट देऊन हप्त्याने वीज बिल भरण्याची सुविधा प्राप्त करून घ्यावी. जे ग्राहक वीज बिल भरणार नाहीत, त्यांचा वीजपुरवठा नाईलाजास्तव खंडित करावा लागेल.
– प्रभाकर निर्मळे-मुख्य अभियंता, महावितरण परिमंडल