दोन वर्षांचा काळ लोटला तरी अद्याप तलावाचे काम अर्धवट : पंधरा एकरमध्ये तलावाचा विस्तार
वार्ताहर /उचगाव
उचगावच्या पूर्व बाजूला असलेल्या तलावाची खोदाई, चोहोबाजूंनी बांधकाम आणि मॉर्निंग वॉकर्स ट्रक, तलावाच्या चोहोबाजूंनी सुशोभिकरण अशा प्रकारचा घाट शासनामार्फत तयार करून दोन वर्षांचा काळ लोटला. मात्र, अद्याप या तलावाचे काम अर्धवट असून पावसाळय़ापूर्वी ते पूर्णत्वाला न्यावे, अशी मागणी उचगाव ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. खोदाईसाठी तलावातील पाणी कमी होण्याची वाट पाहत असताना पाणी कमी होऊन दोन महिने लोटले तरी अद्याप त्याची खोदाई& करण्यात आलेली नाही. ती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
सार्वजनिक विहिरींतील पाणी पातळी टिकून राहण्यासाठी हा तलाव अत्यंत महत्त्वाचा आहे. या भागातील हा सर्वात मोठा तलाव असून सुमारे बारा ते पंधरा एकर जागेमध्ये विस्तारला आहे. या तलावामधील पाण्याचा उपयोग शेतीसाठी मोठय़ा प्रमाणात होतो.
या तलावापासून कालव्यांची निर्मिती केली असून या कालव्याद्वारे पाणी शेतवडीला पुरविले जाते. उन्हाळय़ात या तलावामध्ये पाणी टिकून राहिले तर शेतकऱयांची पिके भरघोस येण्यास मदत होते. गेल्या दोन वर्षांपासून या तलावाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र ते अद्याप अपूर्णच आहे.
ठेकेदाराचे दुर्लक्ष कारणीभूत
या तलावाची खोदाई पाच फूट करून माती बाहेर टाकून त्यामध्ये पुन्हा एक फुटाचा थर काळय़ा मातीचा टाकण्याची योजना आहे. कारण काळय़ा मातीमुळे जमिनीत पाणी न मुरता पाण्याचा साठा टिकून राहतो. पण सदर काम अद्याप खोळंबले आहे. या तलावातील पाणीसाठा सध्या पूर्णपणे आटलेला आहे. तरीदेखील ठेकेदाराने अद्याप इकडे येऊन पाहिले नाही. सदर काम तातडीने एप्रिल-मे या दोन महिन्यांमध्ये पूर्ण होणे गरजेचे आहे. जूननंतर पावसाला सुरुवात झाल्यानंतर पाणी साचून राहिल्यास सदर काम पुन्हा जमणार नाही. यासाठी तातडीने तलाव दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे, अशी मागणी नागरिकांच्यावतीने करण्यात येत आहे.