उभय संघात 3 वनडे तसेच 3 टी-20 सामन्यांचे आयोजन, जडेजा उपकर्णधार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
या महिन्यात आयोजित विंडीज दौऱयातील 3 वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे सोपवण्यात आले आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली, रिषभ पंत यांना या मालिकेतून विश्रांती देण्यात आली. ही मालिका दि. 22 जुलैपासून पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथे खेळवली जाईल.
जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, तसेच अलीकडेच यशस्वी आयपीएल मोहिमेनंतर संघात परतलेला हार्दिक पंडय़ा या वरिष्ठ खेळाडूंना देखील विश्रांती दिली गेली आहे. दीपक हुडा, संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड व अवेश खान हे इंग्लंडविरुद्ध 12 जुलैपासून खेळवल्या जाणाऱया वनडे मालिकेत समाविष्ट नसलेले खेळाडू विंडीज दौऱयासाठी 16 सदस्यीय संघात निवडले गेले आहेत. डिसेंबर 2020 मध्ये आपली शेवटची वनडे खेळणारा शुभमन गिल देखील विंडीज दौऱयात समाविष्ट असेल. या वनडे मालिकेसाठी रविंद्र जडेजा उपकर्णधार असणार आहे.
आगामी टी-20 वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघ केवळ 3 वनडे खेळणार असून त्यामुळे या मालिकेतून वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय आश्चर्याचा नव्हता. वनडे मालिकेनंतर भारतीय संघ विंडीज व अमेरिकेत 5 टी-20 देखील खेळणार आहे.
सध्या केवळ वनडे क्रिकेट खेळणाऱया शिखर धवनने गतवर्षी लंका दौऱयात प्रथमच भारतीय संघाचे नेतृत्व भूषवले होते. त्यावेळी संघातील सर्व कसोटी स्पेशालिस्ट इंग्लंड दौऱयावर असल्याने त्याला नेतृत्वाची संधी मिळाली होती.
भारतीय संघ ः शिखर धवन (कर्णधार), रविंद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकुर, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, अवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
भारत-विंडीज मालिकेची रुपरेषा
तारीख / लढत / भारतीय प्रमाणवेळ / ठिकाण
22 जुलै / पहिली वनडे / सायं. 7 वा. / पोर्ट ऑफ स्पेन
24 जुलै / दुसरी वनडे / सायं. 7 वा. / पोर्ट ऑफ स्पेन
27 जुलै / तिसरी वनडे / सायं. 7 वा. / पोर्ट ऑफ स्पेन
29 जुलै / पहिली टी-20 / रात्री 8 वा. / टॅरोबा
1 ऑगस्ट / दुसरी टी-20 / रात्री 8 वा. / बॅसेतेरे
2 ऑगस्ट / तिसरी टी-20 / रात्री 8 वा. / बॅसेतेरे
6 ऑगस्ट / चौथी टी-20 / रात्री 8 वा. / लॉडरहिल
7 ऑगस्ट / पाचवी टी-20 / रात्री 8 वा. / लॉडरहिल
सातत्याने कर्णधार बदलाची मोहीम कुठवर?
मागील वर्षभरात खूपच कर्णधार बदलले गेले असून यावरुन क्रिकेट वर्तुळातील एका गटाकडून टीका सुरु झाली आहे. भारतीय निवड समितीने मागील वर्षभराच्या कालावधीत बुमराह, पंत, राहुल, हार्दिक, धवन असे कित्येक कर्णधार आजमावून पाहण्यावर भर दिला आहे. व्यवस्थापनाने भरगच्च क्रिकेट व दुखापतींच्या कारणामुळे असे बदल करावे लागले असल्याचे यापूर्वी स्पष्ट केले आहे.