रोजगार ‘मेगाभरती’ला प्रारंभ ः 75 हजार नवनियुक्त कर्मचाऱयांची दिवाळी गोड
येत्या दीड वर्षात 10 लाख नोकऱया देण्याची तयारी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी धनत्रयोदशीच्या दिवशी ‘मेगाभरती’ मोहिमेला सुरुवात केली. या मोहिमेद्वारे पुढील दीड वर्षासाठी म्हणजेच डिसेंबर 2023 पर्यंत 10 लाख तरुणांना नोकऱया देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही भरती युपीएससी, एसएससी, रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (आरआरबी) आणि इतर केंद्रीय एजन्सीद्वारे केली जाईल. या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी 50 केंद्रीय मंत्र्यांनी विविध ठिकाणी 75 हजार 226 तरुणांना नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान करत दिवाळीचे मोठे गिफ्ट दिले.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सरकारी पदांवरील नियुक्त्या रखडल्या होत्या. यावषी जूनमध्ये पंतप्रधान मोदींनी घोषणा केल्यानुसार सरकार येत्या 18 महिन्यांत 10 लाख लोकांची भरती करेल. त्यानंतरच मेगाभरती मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअंतर्गत शनिवारी विविध ठिकाणी झालेल्या रोजगार मेळाव्यात 75 हजार तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. या समारंभात व्हर्च्युअल प्रणालीद्वारे तरुणांना संबोधित करताना पंतप्रधानांनी आजचा दिवस भारताच्या युवा शक्तीसाठी सुवर्णमय असल्याचे सांगितले. गेल्या 8 वर्षात देशात रोजगार आणि स्वयंरोजगाराची मोहीम सुरू असून आज त्याला आणखी एक दुवा जोडला गेल्याचेही त्यांनी नमूद केले. याशिवाय पंतप्रधानांनी रोजगाराबाबत अधिक माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रोजगार मेळाव्याचे उद्घाटन केले. याअंतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात देशातील 75 हजार तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. आता नजिकच्या काळात 38 मंत्रालये आणि विभागांमध्ये नोकऱया दिल्या जातील. येत्या काही महिन्यांत भारत सरकारकडून अशीच नियुक्ती पत्रे लाखो तरुणांना वेळोवेळी दिली जातील, असे पंतप्रधान म्हणाले. 7-8 वर्षांच्या मेहनतीनंतर आज केंद्र सरकारच्या खात्यांमध्ये एवढी निकड, क्षमता आल्याचे त्यांनी नमूद केले. कोरोना व्हायरसचा फैलाव देशभर पसरल्यानंतर बेरोजगारीची संख्या झपाटय़ाने वाढली होती. याचा सर्वाधिक फटका शहरी भागाला बसल्याचे दिसून आले.
राज्यांमधील रोजगाराची स्थिती
राजस्थानात बेरोजगारीच्या बाबतीत सर्वात वाईट स्थिती आहे. सप्टेंबरमध्ये येथे बेरोजगारीचा दर 23.8 टक्के होता. यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये हा आकडा 23.2 टक्के, हरियाणामध्ये 22.9 टक्के इतका होता. तर, आसाममध्ये हा दर सर्वात कमी म्हणजे 0.4 टक्के आहे. त्यापाठोपाठ उत्तराखंड (0.5 टक्के) आणि मध्यप्रदेश (0.9 टक्के) इतका असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
आत्मनिर्भर भारतासाठी धडपड
विकसित भारत संकल्पपूर्तीसाठी आम्ही आत्मनिर्भर भारताच्या मार्गावर चालत आहोत. आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. 7-8 वर्षात आम्ही दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. गेल्या 8 वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेत अडथळे निर्माण करणाऱया उणिवा आम्ही दूर केल्यामुळे हे शक्मय होत असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. स्टार्टअप इंडिया मोहिमेने देशातील तरुणांची क्षमता जगभरात प्रस्थापित केली आहे.
उद्योगधंद्यांना नवे बळ
रोजगाराच्या अनेक नवीन संधी निर्माण होत आहेत. आज वाहनांपासून ते मेट्रोचे डबे, रेल्वेचे डबे, संरक्षण उपकरणे अशा अनेक क्षेत्रांत निर्यात झपाटय़ाने वाढत आहे. भारतात कारखाने वाढल्यामुळे कामगारांची संख्याही वाढत आहे. 2014 पर्यंत देशात काही मोजकेच 100 स्टार्टअप होते, आज ही संख्या 80,000 पेक्षा जास्त झाल्याचे पंतप्रधानांनी गौरवपूर्णपणे नमूद केले. शहरांबरोबरच खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रातही रोजगार वाढत आहेत. देशात प्रथमच खादी आणि ग्रामोद्योगने एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या वर्षांत खादी आणि ग्रामोद्योगात निर्माण झालेल्या नोकऱयांमध्ये महिला वर्गाचा वाटा मोठा असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.
महिला, तरुणांसाठी नव्या संधी उपलब्ध
गेल्या वर्षांत 8 कोटी महिला स्वयं-सहायता गटांशी जोडल्या गेल्या आहेत. या महिलांना भारत सरकार आर्थिक मदत करत आहे. या करोडो महिला आता देशभरात आपली उत्पादने विकत आहेत. त्यांचे उत्पन्न वाढवत आहेत. तसेच स्थानिक पातळीवर तरुणांसाठी लाखो रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जात आहेत. आधुनिक पायाभूत सुविधांसाठी सुरू असलेली ही सर्व कामे पर्यटन क्षेत्रालाही नवी ऊर्जा देणारी आहेत. देशभरात श्रद्धा, अध्यात्म, ऐतिहासिक महत्त्व असलेली ठिकाणेही विकसित केली जात आहेत. या सर्व प्रयत्नांमुळे रोजगार निर्मिती होत आहे.
निमलष्करी दलात रिक्त पदे
गृह मंत्रालयाने अलीकडेच राज्यसभेत निमलष्करी दलातील रिक्त पदांची माहिती दिली होती. त्यानुसार 31 जुलै 2022 पर्यंत आसाम रायफल्स (6,044), बीएसएफ (23,435), सीआयएसएफ (11,765), सीआरपीएफ (27,510), आयटीबीपी (4,762), एसएसबी (11,143) अशी रिक्त जागांची स्थिती आहे. तसेच रेल्वे मंत्रालयात 2 लाख 93 हजार 943 पदे रिक्त असल्याची आकडेवारी सांगते. गृह मंत्रालयात हा आकडा 1 लाख 43 हजार 536 असून संरक्षण मंत्रालयात 2 लाख 64 हजार 706 पदे रिक्त आहेत.
विरोधकांनी सरकारला घेरले
विशेष म्हणजे महागाई, रोजगारासह अनेक मुद्यांवर भारतातील विरोधी पक्ष केंद्र सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. काँग्रेस नेते ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान सरकारवर सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. हा एक दिखाऊपणा आणि आकडय़ांचा खेळ असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. तरीही सद्यस्थितीत रोजगारांसंबंधीची ही घोषणा दोन राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि 2024 मध्ये होणाऱया लोकसभा निवडणुकीत सरकारसाठी फायदेशीर ठरू शकते.