रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा इशारा
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आभासी चलनांमध्ये गुंतवणूक घातक आहे, असा इशारा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिला आहे. ही गुंतवणूक 100 टक्के धोकादायक आहे. लोकांनी असे आभासी चलन खरेदी करण्याच्या मोहात पडू नये. पुढचे आर्थिक संकट या आभासी चलनामुळे (क्रिप्टो करन्सी) येऊ शकते. त्यामुळे सर्व संबंधितांनी सावध रहावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
बँकांनी लवकरात लवकर आभासी चलनाचे व्यवहार आटोक्यात आणावेत. तसे त्यांनी न केल्यास अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच आर्थिक स्थैर्य धोक्यात येऊ शकते. खासगी आभासी चलने आणि त्यांच्या व्यवहारांचे व्यवस्थापन करणाऱया संस्था किंवा कंपन्या सरकारचे कोणतेही नियम पाळत नाहीत. त्यांच्या स्वतःची यंत्रणा असल्याने ते सहजगत्या सरकारी नियंत्रक यंत्रणेला चकवा देऊ शकतात किंवा सरकारी यंत्रणेला वळसा घालून आपले व्यवहार सुरु ठेवू शकतात. त्यामुळे बँकांनी अतिशय सावधपणे ही स्थिती हाताळली पाहिजे. अन्यथा, फार मोठय़ा आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागू शकते, असाही इशारा त्यांनी दिला.
अमेरिकेचे उदाहरण
आभासी चलनाचा बाजार (एफटीएक्स) अमेरिकेत नुकताच अचानकपणे कोसळला आहे. एफटीएक्सचे एकंदर बाजारी मूल्य 32 अब्ज डॉलर्स होते. गेल्या महिन्यात अचानक हा बाजार कोसळल्याने एफटीएक्सने अमेरिकेत दिवाळखोरी घोषित करत दिवाळखोरीचे प्रमाणपत्र घेण्यासाठी अर्ज केला आहे. या बाजाराचा संस्थापक, सॅम बँकमन फ्राईड याच्यावर अमेरिकेने आरोपपत्र सादर केले आहे. आता फ्राईड याने आभासी चलनाची सुरक्षितता वाढविण्यासाठी पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. आभासी चलनाचे बाजारमूल्य 190 अब्ज डॉलर्सवरुन 140 अब्ज डॉलर्सपर्यंत घसरले आहे. ते आणखीही घसरु शकते कारण त्याला कोणतेही किमान स्थिर मूल्य नाही, अशी माहिती दास यांनी दिली.
भारतात बंदी, पण…
साधारणतः 10 वर्षांपूर्वी आभासी चलनाने भारतात प्रवेश केला. पण तेव्हापासूनच रिझर्व्ह बँकेने त्यावर बारकाईने लक्ष ठेवले आहे. अशा चलनांच्या व्यवहारांमध्ये फसवणूक वाढल्याने 2018 मध्ये त्यावर बंदी आणण्यात आली. मात्र, 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवून निर्बंध शिथील केले. त्यामुळे या चलनाचे व्यवहार करणारे स्थानिक मंच निर्माण झाले आणि व्यवहार मोठय़ा प्रमाणात वाढले. तथापि, अशा चलनांच्या व्यवहारातून मिळणाऱया लाभावर 30 टक्के कर लावण्यात आल्याने आता त्यांचे व्यवहार 90 टक्के कमी झाले आहेत.