रत्नागिरी प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या वर्षाकरिता छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनर्निरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात मतदार यादीच्या पुनरिक्षण पूर्व उपक्रमामधील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याद्वारे प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करण्याचा उपक्रम २१ जुलै ते २१ ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात येणार आहे.
या कालावधीत संबंधित बीएलओ हे मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदार यादीतील मतदारांच्या तपशिलाची पडताळणी संबंधीत कुटुंबप्रमुखांकडून गोळा करणार आहेत. यामध्ये बीएलओ प्रामुख्याने मतदार यादीत नाव नसलेले पात्र नागरिक, संभाव्य मतदार १ जानेवारी २०२४ रोजीच्या अर्हता दिनांकावर वयाची १८ वर्ष पूर्ण करणारे तसेच १ एप्रिल, १ जुलै व १ ऑक्टोबर २०२४ या अर्हता दिनांकावर वयाची १८ वर्ष पूर्ण करणारे व मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पात्र मतदार, दुबार नोंदी/मृत मतदार/ कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदार, मतदार यादीमध्ये दुरुस्ती आदी मुद्द्यांची घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत.
२२ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर २०२३ या कालावधीत मतदार केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण व मतदार यादी/ मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी १७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रसिध्द करण्यात येणार असून, त्यावरील दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२३ असा आहे. अंतिम मतदार यादी ५ जानेवारी २०२४ रोजी प्रसिध्द केली जाणार आहे.
दावे व हरकती सादर करण्यासाठी उक्त नमुना अर्ज तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत. सदर दावे व हरकती बाबत मतदार नोंदणीचे ऑफलाईन अर्ज संबंधित तहसील कार्यालयात (निवडणूक शाखा) अथवा बीएलओमार्फत सादर करण्यात यावेत, किंवा ऑनलाईन अर्ज Voter Service Portal, Voter Portal या संकेत स्थळावर व Voter Helpline या Mobile App वर देखील सादर करता येतील.
या मोहिमे संदर्भात नागरिकांना किंवा मतदारांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी त्यांच्या क्षेत्रातील मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय किंवा त्यांचे तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखेशी संपर्क साधावा. बीएलओंची यादी प्रत्येक तहसील कार्यालयात उपलब्ध आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम. देवेंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येत आहे.
जिल्ह्याची मतदार यादी अचूक व सुदृढ होण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी केले आहे.