प्रतिनिधी/ मडगाव
राज्यात कांदय़ाचे दर वाढत असल्याने मडगाव येथे महिला काँग्रेसतर्फे 25 रुपये किलोच्या दराने कांदे विकण्यात आले. कांदय़ाची गरज प्रत्येक जनतेला आहे. त्यामुळे सरकारने लोकांना कांदे स्वस्त दरात उपलब्ध करण्याची गरज आहे. सरकार दहा दिवसांच्या आत कांदय़ाचे दर कमी करत नाही तर महिला काँग्रेसतर्फे प्रत्येक गावात जावून रु. 25 किलोच्या दराने कांदे विकण्यात येईल, असा इशारा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी दिला.
कांदय़ाचे दर वाढल्याने भाजप सरकारचा निषेध करण्याकरिता मडगाव येथे रु. 25 किलोच्या दराने कांदे विकताना त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
पूर्वी कांदा कापताना गृहिणींच्या डोळय़ात अश्रू येत होते. आता बाजारात जाऊन कांदे खरेदी करण्यासाठी जनतेच्या डोळय़ातून अश्रू येऊ लागले आहे. काँग्रेसने रु. 25 किलोच्या दराने कांदे विकण्याचा उद्देश पैसे कमविण्याचा नव्हता. तर भाजप सरकारला महिला काँग्रेसचे कार्य बघून लाज वाटायला पाहिजे. राज्यात एकूण 16 लाख लोकसंख्या आहे. फक्त 3.50 लाख लोकांकडे रेशन कार्ड आहे. तेव्हा भाजपने ठराविक लोकांच्या हितासाठी निर्णय न घेता राज्यातील संपूर्ण लोकांचे हित बघून निर्णय घेण्याची गरज असल्याचे प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या.
भाजप सरकारने कधीही शेतकऱयांच्या हितासाठी कार्य केलेले नाही. त्यांनी सदैव शेतकऱयांना लुटण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या फलोत्पादन दालनामध्येसुद्धा कांदे स्वस्त दराने विकण्याऐवजी महाग दग्नराने विकले जातात. फलोत्पादनमधूनसुद्धा लोकांनी कांदे खरेदी करण्याचे बंद केलेले आहे. त्यामुळे कांदे कुजण्याचे प्रकार घडत असल्याच्या अनेक तक्रारी येऊ लागलेल्या आहेत. प्रवीण झाटय़े यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
जेव्हा नारळाचे दर वाढले होते तेव्हा सुद्धा महिला काँग्रेसने रस्त्यावर उतरुन एक नारळ 20 रुपयाने विकला होता. तेव्हा मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर होते. त्यांनी लगेच फलोत्पादनमधून स्वस्त दराने नारळ विकण्यात सुरुवात केली होती. आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीसुद्धा त्याच पद्धतीने निर्णय घेण्याची गरज आहे. 14 नोव्हेंबरला दिवाळी येत असून भाजप सरकारने लोकांना आनंदाने दिवाळी साजरा करायला द्यावी, अशी मागणी कुतिन्हो यांनी यावेळी केली.