आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार : महाराष्ट्रात जाण्याची तळमळ महाराष्ट्राच्याच भूमीमध्ये दाखवून देणार : महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार
वार्ताहर /किणये
मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने मुंबई येथे मंगळवारी आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी तालुक्याच्या विविध गावांतून म. ए. समितीचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सोमवारी रवाना झाले. महाराष्ट्रात जाण्याची आपली तळमळ महाराष्ट्राच्याच भूमीमध्ये दाखवून देण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी विविध गावांतून टेम्पो, कारमधून काही कार्यकर्ते रवाना झाले. सायंकाळी रेल्वेमधूनही कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. मुंबईतील आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार या कार्यकर्त्यांनी केला आहे. बेळगाव हे मुंबई प्रांतात होते. 1956 सालच्या भाषावार प्रांतरचनेनंतर मराठी बहुभाषिक भाग अन्यायाने तत्कालिन म्हैसूर राज्यात डांबण्यात आला. तेव्हापासून म. ए. समितीच्या माध्यमातून सीमाप्रश्नाच्या लढ्याला सुरुवात झाली. मराठी बहुभाषिक भाग महाराष्ट्रात विलीन करावा, हीच मागणी आजपर्यंत सीमावासीय करीत आहेत. गेल्या 66 वर्षांपासून सीमाबांधव लोकशाही मार्गाने सीमाप्रश्नाचा लढा लढत आहेत. या लढ्याला पुन्हा एकदा बळकटी देण्यासाठी आणि महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी ‘चलो मुंबई’ आंदोलनात म. ए. समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
सीमाप्रश्नाच्या लढ्यामध्ये अनेकांनी हौतात्म्य पत्करले आहे. लाठ्या खाल्लेल्या आहेत आणि तुरुंगवासही भोगला आहे. सध्या या लढ्यामध्ये चौथी पिढी सक्रिय झाली आहे. मात्र, सीमाबांधवांवर महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. बेळगाव परिसरात मराठी भाषिकांवर सातत्याने अन्याय, अत्याचार होऊ लागला आहे. यासाठी आता महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्न सोडवून घेण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकजुटीने केंद्राकडे आवाज उठविण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी आणि आपली तळमळ दाखवून देण्यासाठी मंगळवारचे मुंबईतील सीमाबांधवांचे आंदोलन महत्त्वाचे ठरणार आहे. या ‘चलो मुंबई’ आंदोलनाची जनजागृती तालुका म. ए. समितीच्या नेतेमंडळींनी गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून गावागावांमध्ये केली आहे. सीमाप्रश्नाच्या लढ्यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळेच मुंबईला नेतेमंडळींबरोबरच कार्यकर्ते मोठ्या संख्येने रवाना झाले आहेत. बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील मच्छे, पिरनवाडी, वाघवडे, किणये, कर्ले, बहाद्दरवाडी, जानेवाडी, बेळगुंदी, बोकनूर, राकसकोप, बेळवट्टी, सोनोली, इनाम बडस, बाकनूर, मजगाव, देसूर, नंदिहळ्ळी, राजहंसगड आदींसह हलगा, बस्तवाड, हिंडलगा, कंग्राळी खुर्द, काकती, होनगा भागातील कार्यकर्ते रवाना झाले आहेत.
आंदोलनासाठी खानापूर येथून कार्यकर्ते मुंबईला
मुंबई येथील आझाद मैदानावर मंगळवार दि. 28 रोजी होणाऱया धरणे आंदोलनासाठी खानापूर तालुका म. ए. समितीचे शेकडो कार्यकर्ते सोमवारी सायंकाळी मुंबईला रवाना झाले. येथील शिवस्मारक आवारातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून हे कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना झाले. शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, सचिव सीताराम बेडरे, आबासाहेब दळवी, संजय पाटील यांनी केले. यावेळी म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी जय शिवाजी, जय भवानी, बेळगाव कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र में नहीं तो जेल में आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते मुंबई धरणे आंदोलनासाठी सहभागी झाले आहेत. म. ए. समितीत एकी झाल्याने तालुक्यातील समिती कार्यकर्ते मोठय़ा संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत. तालुक्यातील चार जिल्हा पंचायत क्षेत्रातील समिती कार्याकर्ते सहभागी झाले आहेत. समितीचे पाच उपाध्यक्ष जयराम देसाई, कृष्णा मन्नोळकर, अर्जुन देसाई, मारुती गुरव, कृष्णा कुंभार, अध्यक्ष गोपाळ देसाई, सचिव सीताराम बेडरे, कार्याध्यक्ष यशवंत बिरजे, खजिनदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली जागृती करण्यात आली. धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी माजी आमदार दिगंबर पाटील, मुरलीधर पाटील, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, आबासाहेब दळवी, निरंजन सरदेसाई, रमेश धबाले, रुक्माण्णा झुंजवाडकर, पुंडलिक पाटील, विठ्ठल गुरव, जयराम देसाई, विलास बेळगावकर, कृष्णा मन्नोळकर, अमृत पाटील, अर्जुन देसाई, अभिजीत सरदेसाई, यशोधन सरदेसाई, अशोक पाटील, प्रभाकर सू. पाटील, ब्रह्मानंद पाटील, वीरुपाक्ष पाटील, मुकुंद पाटील, आप्पाण्णा गुरव, संजय पाटील, परशराम भुजगुरव, गुंडूराव खांबले, म्हात्रू धबाले, परशराम चोपडे आदी कार्यकर्ते रवाना झाले आहेत.
धामणे-बस्तवाडमधील कार्यकर्ते रवाना
महाराष्ट्र सरकारला सीमाप्रश्नी जाग आणून देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने दि. 28 रोजी मुंबई येथील धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि बस्तवाड (हलगा) येथील म. ए. समितीचे कार्यकर्ते धामणे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून मुंबईकडे सोमवारी रवाना झाले. यामध्ये यल्लाप्पा रेमाणाचे, विजय बाळेकुंद्री, मनोहर जायाणाचे, महादेव यळवी, परशराम कोमाणाचे, पंडित पाटील, युवराज मादाकाचे, सोमनाथ मेलगे, विठ्ठल पाटील, यल्लाप्पा घंटाणी, किरण चतूर, उमेश डुकरे, रघुनाथ बुवाजी, तातोबा मरगाणाचे, परशराम लोकळूचे आदी 70 कार्यकर्ते या भागातून धरणे आंदोलनात भाग घेणार आहेत.